राणे समर्थकांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं, रत्नगिरीत जोरदार पोस्टरबाजी


रत्नागिरी: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक आणि संतोष परब हल्ला प्रकरणानंतर राणे आणि शिवसेनेत रंगलेला सामना अजूनही संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या पॅनेलचा विजय झाल्यानंतर कोकणात राणे समर्थकांकडून शिवसेनेला डिवचणारे बॅनर्स झळकताना दिसत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरीत राणे समर्थकांकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली. 'सुवर तो झुंड में आते है, शेर तो अकेला आता है, माईंड इट' अशा मथळ्याचे बॅनर्स सध्या रत्नागिरीत अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. यावर आता कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल. काही दिवसांपूर्वी राणे समर्थकांनी सोशल मीडियावर एक कार्टून व्हायरल केले होते. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत शिरणाऱ्या वाघाची शेपटी यांनी पकडलेली दिसत आहे. विशेष म्हणजे हा वाघ मांजरीसारखा दिसत आहे. या माध्यमातून राणे समर्थकांनी एकप्रकारे शिवसेनेची खिल्ली उडविली होती. तत्पूर्वी मुंबई आणि ठाण्यात शुक्रवारी नितेश राणे यांची खिल्ली लावणारे बॅनर्स लावण्यात आले होते. 'हरवला आहे' अशा मथळ्याखालील या बॅनरमध्ये नाव नितेश नारायण राणे, उंची दीडफुट, रंग गोरा, वर्णन डोळे नेपाळ्यासारखे, डोक्याने मंद असा मजकूर लिहण्यात आला होता. पोलिसांनी हे बॅनर्स तातडीने उतरवले होते. नितेश राणेंना ७ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण संतोष परब हल्लाप्रकरणामुळे गोत्यात आलेले भाजप आमदार आणि नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने ७ जानेवारीपर्यंत नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही न्यायालयात दिली. त्यामुळे नितेश राणे यांना ७ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी ७ जानेवारीला दुपारी २.३० वाजता होईल. यापूर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अटकेच्या भीतीने नितेश राणे तब्बल आठवडाभरापासून अज्ञातवासात आहेत. मात्र, आता अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाल्याने ते अज्ञातवासातून बाहेर येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तसेच उच्च न्यायालयाने याप्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याला मंजूरी देणे, हादेखील नितेश राणे यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात आता नितेश राणे आणि सरकारी वकिलांमध्ये काय युक्तिवाद होणार, हे पाहावे लागेल.


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3pPwQH8
https://ift.tt/3eP25vA

No comments

Powered by Blogger.