Nitesh Rane: नितेश राणेंना जेल की बेल, सतीश मानशिंदे आणि सरकारी वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद, पुढे काय घडणार?

सिंधुदुर्ग: संतोष परब हल्लाप्रकरणात सहभाग असल्याचा ठपका असणारे भाजप आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर काहीवेळापूर्वीच सुनावणीला सुरुवात झाली. नितेश राणे यांच्या जामिनासाठी अ‍ॅडव्होकेट सतीश मानशिंदे, संग्राम देसाई आणि महेश सावंत अशा तगड्या वकिलांची फौज न्यायालयात उभी करण्यात आली आहे. तर सरकारी पक्षाकडून अ‍ॅडव्होकेट प्रदीप घरत हे युक्तिवाद करत आहेत. सुनावणीला सुरुवात झाल्यापासूनच दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद पाहायला मिळत आहे. सरकारी वकिलांनी नितेश राणे हे शरण आलेलेच नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शरण अर्जच दाखल केलेला नाही. त्यामुळे नितेश राणे यांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. त्यावर नितेश राणे यांचे वकील सतिश मानशिंदे यांनी विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाने माझ्या अशिलाला १० दिवसांचा वेळ दिला आहे. आमच्याकडे कायदेशीर प्रक्रियेकरता वेळ असल्याचे सतीश मानशिंदे यांनी सांगितले. यापूर्वी नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात तब्बल चार दिवस सुनावणी सुरु होती. त्यानंतर नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता. त्यामुळे आता आजच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना नियमित जामीन फेटाळल्यास त्यांना पुन्हा उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल. तर दुसरीकडे ज्यांच्यावर हल्ला झाला त्या संतोष परब यांनीही आज न्यायालयात उपस्थिती लावली. यावेळी संतोष परब यांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडत, नितेश राणे यांना जामीन देऊ नये, अशी मागणी केली. नितेश राणेंचा फोन स्वीय सहाय्यकाकडे होता? या सुनावणीदरम्यान संतोष परब यांच्यावरील हल्ल्यावेळी नितेश राणे यांचा फोन त्यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्याकडे असल्याची माहिती अ‍ॅडव्होकेट सतीश मानशिंदे यांनी दिली. संतोष परब यांच्यावर हल्ला करणारा सचिन सातपुते आणि नितेश राणे यांच्या स्वीय सहाय्यक राकेश परब यांचे काय संबंध आहेत, हे आम्हाला माहिती नाही. नितेश राणे यांचा फोन राकेश परब यांच्याजवळ असल्याने त्याने परस्पर मोबाईलचा वापर केला असू शकतो, असे सतीश मानशिंदे यांनी म्हटले. राकेश परब आणि सचिन सातपुते यांच्यात फोनवरुन बोलणे झाले म्हणून नितेश राणे यांचा सचिन सातपुतेंशी संबंध आहे, असा अर्थ काढता येणार नाही. नशीब अशा गुन्ह्यांमध्ये टाडा कायदा लागू होत नाही, अन्यथा पोलिसांनी नितेश राणे यांच्यावर टाडा अंतर्गत गुन्हा दाखल केला असता, असेही सतीश मानशिंदे यांनी म्हटले. तसेच हल्ल्यादरम्यान संतोष परब यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. एका गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये संतोष परब यांना खरचटण्यापलीकडे जखम झालेली नाही. घटना घडली तेव्हा कारमध्ये दोन व्यक्ती होत्या. मग पोलिसांनी चार जणां ताब्यात कसे घेतले? संतोष परब यांना टाके पडले नाहीत किंवा त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली नाही. हल्ल्यानंतर त्यांनी माध्यमांना लगेच प्रतिक्रिया दिली, असेही अ‍ॅडव्होकेट सतीश मानशिंदे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. कणकवलीत कडेकोट पोलीस बंदोबस्त दरम्यान, या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कणकवली परिसरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्र न्यायालय असलेल्या ओरोस आणि कणकवली परिसरात भाजप कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कणकवलीत चौकाचौकात पोलिसांच्या तुकड्या दिसत आहेत. याशिवाय, शहरात राज्य राखीव पोलीस दल आणि दंगल नियंत्रण पथकाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/Co0q3N4Kb
https://ift.tt/taCvYZIS8

No comments

Powered by Blogger.